बहुमीवाद (MULTISUBJECTIVISM ) श्रीधर तिळवे नाईक 
कलेच्या क्षेत्रात कलावंत  म्हणजे काय असा प्रश्न नेहमी असतो आणि ह्या प्रश्नाचे उत्तर नेहमीच तत्कालीन ज्ञानावर अवलंबून असते .मराठीत प्रतीसृष्टीय अस्तित्ववादाचा प्रचंड प्रभाव अध्यापही टिकून आहे  आणि त्यामुळे एकसंध मीचा खुळचटपणाही ! अस्तित्वजन्यता ही अद्यापही नवीन पिढीला भारून टाकतांना दिसते ह्याचा अर्थ इतकाच असतो कि आपण अध्यापही सृष्टीय व्यवस्थावादाच्या वरवंट्याखाली  प्रचंड भरडले  जात आहोत  आणि नवीन कवी लेखकांना अद्यापही व्यवस्थेला प्रतिसाद देण्यासाठी  अस्तित्ववादी  संवेदनशीलता आवश्यक  वाटते . अस्तित्ववाद हा  नवीन व्यवस्थावादाला  दिलेला  पारंपारिक  प्रतिसाद  होता  हे  ह्या  नवीन लोकांना  कोण  सांगणार ? ज्यांना  अद्याप  काफ्का  आणि  सात्रच्या  उचक्या  येतात  त्यांच्या  अस्तित्वपिडेविषयी आपण फक्त सहानुभूती दाखवू शकतो

ह्यानंतर आलेले पोस्टमॉडर्निस्ट  ! सब्जेक्ट इज़  डेड  अशी घोषणा  देवून  ह्यांनी वादळ  निर्माण केले खरे  पण ह्या वादळाला पेलणारी  कला कलाक्षेत्रात  फारच कमी  निर्माण झाली , मराठीत सुरवातीचा मकरंद साठेचा   अपवाद वगळता  सारा  ठणठणाठ  ! सर्वात वाईट  म्हणजे मकरंद  साठेही  रोमन साम्राज्याची पडझड  आणि  चारशे  कोटी  विसरभोळे  नंतर  देशिवादाच्या तंबूत  शिरले  आणि  स्वत : च्या  संवेदनशीलतेची  पडझड  करते  झाले .  .

ह्याला छेद दिला तो नव्वदोत्तरी चौथ्या नवतेच्या  कवींनी ! मी  ''चौथ्या परंपरेचा  शोध '' असा एक लेख १९९२ च्या नव्यांची अक्षर चळवळ मध्ये लिहिला होता . तोच मग नंतर  सौष्ठवच्या पहिल्या अंकात (फेब १९९३ ) '' चौथ्या नवतेचा शोध ''  ह्या नावाने छापला गेला त्या लेखाने बऱ्यापैकी  खळबळ  उडवली  आणि   तो वाचून मुंबई विद्यापीठाच्या  मराठी विभागात नवीन काय चाललय ते आपल्या  विद्यार्थांना  कळायला हवे  म्हणून माझ्या  कवितांचे  वाचन  ठेवले गेले  . तेव्हा मराठीत  एम ए  करणारे  तीन विद्यार्थी मला  काव्यवाचनानंतर  भेटले  . हे विध्यार्थी  होते अभिजित देशपांडे , मनोज जोशी आणि  नितीन रिंढे  ! ह्यातील  अभिजित देशपांडेने मला एक पत्र लिहिले होते . ह्या तिघांनाही काहीतरी नवीन करायचे होते पण रूपरेखा स्पष्ट न्हवती . पुढे  हे तिघे नव्वदोत्तरी  चळवळीची  पायाभरणी करणारे  लोक  झाले  .  आम्ही चौघांनी पुढे काय करता येईल ह्याची चर्चा केली . पुढे आम्हाला हेमंत दिवटे येवून मिळाला आणि त्याने स्वतंत्र अंक काढण्यापेक्षा  आपण एकत्रच एक अंक काढूया अशी कल्पना मांडली आणि मी ती स्वीकारली आणि आम्ही सर्वच (ह्यात माझे मित्र  मंगेश बनसोड आणि आल्हाद  भावसारही  होते ) अभिधाला जॉईन झालो  .  हेमंत त्यावेळी  नव्यांची अक्षर चळवळशी जोडला गेला होता आणि  अभिधा तोवर  नव्यांची अक्षर चळवळ चे  अधिक विस्तृत  दालन   होते  आणि त्याने  नुकताच सुरेश भटांच्या  आदरार्थ  गझल विशेषांक  काढला होता . अभिधाचे हे  स्वरूप  बदलण्याशिवाय  पर्याय  न्हवता . नव्या अभिधात  मनोज जोशी ह्या कवीने पोमो संवेदनशीलता आणली आणि अभिजितने त्याच्या कवितेवर एक विस्तृत निबंध लिहिला (तो त्याने का प्रकाशित केलेला  नाही हे एक माझ्यासाठी अद्यापही कोडे आहे ) , पुढे  मी सौष्ठवच्या एका अंकात (१९९९ ) मनोजच्या २५ कविता मुद्दामच छापल्या होत्या आणि त्या कवितांचे विश्लेषणही केले होते मन्या  जोशी इज डेड असे त्यानेच एका कवितेत म्हंटले होते आणि त्याच्यानंतर हेमंत दिवटे , संजीव खांडेकर , सचिन केतकर , नितीन  अरुण कुलकर्णी ह्यांनी ह्या संवेदनशिलतेची कविता अनेक पद्धतीने आणली . हेमंत दिवटे ह्याने आपल्या कुशल संघटन कौशल्याच्या आधारे चौथ्या नवतेचा प्रचंड विस्तार केला . ह्या पोस्ट मॉडनिस्ट कवींनी प्रत्यक्षात सब्जेक्टचा अंत घडवला का ? किंवा त्यांच्या कवितेत ह्या एकसंध '' मी '' चा अंत घडला होता का ? घडलाय का ? कि  हे लोक  अस्तित्ववाद  , अतिवास्तववाद , मार्क्सवाद  ह्यांच्यातच  घुटमळत  राहिले  कि हा  ह्या वादांचा  कमब्याक होता  ?

माझे स्वतः चे मत असे होते कि मूळात पोमो हाही कालबाह्य झाला आहे . त्यामुळेच जेव्हा अभिजित देशपांडे आणि मनोज जोशी ह्यांनी श्याम मनोहर ह्यांच्या  ''कळ '' ह्या कादंबरीचे परिक्षण लिहिले तेव्हा मी दोघांना झापले होते पण मनोज पोमो बाबत ठाम होता माझ्या मते नव्याने  आलेल्या चिन्हसृष्टीत सब्जेक्टचा अंत झालेला नसून उलट अनेक '' मी '' चा उदय झाला आहे आणि पोस्टमॉडर्न ''मी '' च्या अंताचे  भ्रमयुग संपले आहे . त्यामुळे  बहुमीवाद  अटळ आहे


हा बहुमीवाद म्हणजे काय ? तर मेंदूत असलेल्या सर्व काल्पनिक ''मी ं'' चे    त्यांच्या वेगवेगळ्या जीवनशैलीनुसार  कलेत केले गेलेले सादरीकरण ! इथे ''मी''  मृत मानले  जात नाहीत  पण ते सामाजिक संजालित  असून चिन्हजैविक  असल्याचे स्वीकारले जाते . हा स्किज़ोफ्रेनिक प्रकार न्हवे तर आपल्यातल्या ''मी'शी  मेंदुने मांडलेला आध्यात्मिक खेळ आहे।

त्यामुळेच  माझ्या कवितेत  संन्यासी , भविष्यवैज्ञानिक ,   भक्त , योगी , ज्ञानी , दलित , रोमांटीक प्रेमी , देवदास प्रेमी , मॉडेल स्त्री ,  घरगुती स्त्री , बिझनेस वूमन  , प्रेमीका , अंडर डॉन , पंटर , टपोरी , साधक , झेन भिक्खू , इराटिक , कार्यकर्ता , कन्फ्यूझ्ड माणूस , केओटिक माणूस , विद्यार्थी , बेकार , स्ट्रगलर , दुकानदार , गुरु , डीरेक्टर , इस्टेट एजन्ट , भटका , बिल्डर , गावकरी , कवी  , असे अनेक मी दिसतात . हा मग परकायाप्रवेश आहे का ? तर नाही !  हा स्वत : च्याच मेंदुतील अनेक मीच्या चिन्हजैविक  न्यूरॉनिक रचीतात   केलेला  प्रवेश आहे  . माझ्या आयुष्यात मी ह्यातील अनेक मी  जगलो आहे . हे माझ्या मेंदूतल्या ''मी'' न्चे  विश्वरूप दर्शन आहे पटले तर सगळे घ्या नाहीतर जे ''मी''  पटतात ते घ्या किंवा एकही ''मी''  पटला नाही तर सगळा श्रीधर तिळवे नाईक कचऱ्याच्या डब्यात टाकायला तुम्ही मोकळे आहातच . एकसंध एकुलता एक श्रीधर तिळवे नाईक तुम्हाला मिळणार नाही ह्याची मात्र फुल्ल ग्यारेंटी ! हा  अटीट्यूड  हाच बहु''मी''वाद !

आत्मीवाद (सेल्फीझम वा सेल्फनेटिझम )

सेल्फीबाबा ही कादंबरी लिहिताना सेल्फीने झपाटल्या गेलेल्या आत्मजालर्सना सादर करणे जसे अपेक्षित होते तसेच सेल्फ ऑबसेशनकडून सेल्फीऑब्सेशनकडे वाटचाल करण्याऱ्या समाजप्रवाहाला अधोरेखित करणे हेही अपेक्षित असावे नैसर्गिक युगात  अतीचैतन्यवाद ,  विश्वीय युगात अतिआत्मवाद  , सृष्टीय युगात नार्सिसिझम , प्रतिसृष्टीय युगात सेल्फऑब्सेशनिझम ह्यांच्याप्रमाणे चिन्हसृष्टीय युगात सेल्फीझम ही विकृती आहे कि ही ह्या नव्या युगाची प्रवृत्ती आहे हे तपासणे ही माझीच आंतरिक गरज असल्याने मी ही कादंबरी लिहिली होती सेल्फीला नकार देणारा पण दुसऱ्याच्या सेल्फीवेडामुळे सेल्फीबाबा म्हणून प्रसिद्ध पावलेला सेल्फीबाबा हा ह्या कादंबरीचा नायक तो आयुष्यात पुन्हा तपश्चर्येला निघताना पहिली सेल्फी देतो पण श्रीधर तीही डिलिट करतो हा ह्या कादंबरीचा अध्यात्मिक शेवट ! माझ्या काही तरुण मित्रांना आणि विध्यार्थ्यांना ती आवडली आणि नंतर विस्मरणात गेली

बहुमिवाद हे आत्मजालाचे आशयतत्व असेल तर आत्मीवाद हे ह्या आत्मजालाचे आशयाचे अभिव्यक्ती तत्व आहे प्रत्येक आत्मी ही आत्मीयतेने आत्मजालाला सादर करण्याची ''क्लू '' प्ती   खरेतर ''क्लीक'' प्ती असते त्यामुळेच चौथ्या नवतेच्या कलाकृतीचे मूल्यमापन करताना बहुमीवादाप्रमाणे  ''आत्मीवाद'' ही  आपणाला बऱ्याच कसोट्या पुरवू शकतो ह्यातील काही  कसोट्या पुढीलप्रमाणे

१ क्लिकक्षणाची अचूकता
२ क्लिकक्षणांचा कलाकृतीतील प्रवाह
३ क्लिकस्पेसची खोली , व्याप्ती आणि सुरेखीवता
४ क्लिकबॉडीजचे कलाकृतीतील सादरीकरण
५ क्लिकतीव्रता वा क्लिकबम्बाळता
६ आत्मीतील क्लिकर्सचे बौद्धिक आकलन व त्यांचा  बौद्धिक व्यूह
७ क्लिकर्सचे व्यक्तिमत्व
८ क्लिकर्सचे  शक्तीमत्व
९  क्लिकर्सचा भोवतालच्या मार्गी , देशी , पोटी आणि जमाती संस्कृतीशी आलेला आंतरजालीय संबंध आणि त्यांचे स्पंद आणि तंतू

ह्या कसोट्यांच्या आधारे कुठल्याही आत्मजालवादी मग ती बहुमिवादी असो वा आत्मीवादी असो आपण मूल्यमापन करू शकतो 


 श्रीधर तिळवे - नाईक 







Comments

Popular posts from this blog