नवीन पिढीच्या कवींसाठी  दोन शब्द श्रीधर तिळवे नाईक

दिलीप चित्रेंशी चर्चा करतांना ते एक फार गहन मुद्दा उपस्थित करायचे तो म्हणजे मराठी आधुनिकता म्हणजे काय ? मी हा प्रोजेक्ट हाती घ्यावा अशी त्यांनी सूचना केली होती जी मला चौथी नवता विकसित करायची आहे म्हणून मी नाकारली पण आयुष्यभर त्यांच्या ह्या सूचनेने माझा पाठलाग केलाय मराठी आधुनिकतेची सुरवात ते तुकारामापासून करायचे जे मी ठामपणे नाकारायचो माझ्या मते तुकाराम हे मोक्षयुगाशी निगडीत होते आणि त्यांना विज्ञानाची ए बी सी डी ही माहीत न्हवती तुकारामांचा ग्रेटनेस हा होता कि ते धर्मयुगातून निसटले आणि बुद्धाप्रमाणे मोक्षयुगात दाखल झाले निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर चक्रधर ह्या युगाचे नकुलीश लकुलीश कपिल असतील एकनाथ महावीर असतील तर तुकाराम गौतम बुद्ध आहेत आणि जो फरक आहे तो उपायाचा आहे म्हणजे नकुलीश ,लकुलीश ,कपिल ,महावीर ,बुद्ध हे जर योगोपायी ज्ञानोपायी ज्ञानकेंद्री असतील तर तुकाराम एकनाथ भक्तोपायी आहेत आणि साठोत्तरी ढसाळचा अपवाद वगळता अनेक कवी भक्तोपायी आहेत फक्त ढसाळच ज्ञानोपायी आहेत मराठीचे मोक्षयुग ह्या लोकांच्यामुळे बहरले आणि त्यांनी मार्गी मोक्षयुगाचा प्रोजेक्ट मराठीत आणून देशी मोक्षयुग निर्माण केले मराठी आधुनिकतेची चर्चा करायची असेल तर मराठी मोक्षतेची आणि अध्यात्मिकतेची चर्चा आपणास खोलात जाऊन करावी लागेल मराठी लोकांची ह्याबाबत तयारी आहे का ? मराठीचे प्राचीन युग हे अष्मक मूलक सातवहान वाकाटक चालुक्य ह्यांच्यामुळे दमदार होते गाहसतसई ते बृहत्कथा नकुलीश , हाल , गुणाढ्य , कालिदास , कैलास मंदिर , वररुची असे एकापेक्षा एक सरस उद्योग आपण करून बसलोय त्यांची तुलना मोक्षयुगाशी केली तर काय दिसते मलिक अंबर ,शिवाजी , पहिला बाजीराव ह्यांचा ग्रेटनेस मान्यच आहे पण व्यापारवाढीसाठी आवश्यक ती यंत्रणा आपण निर्माण केली नाही असेच दिसते म्हणजे देशी भाषेत अध्यात्म निर्माण झाले राजवट निर्माण झाली पण व्यापारी यंत्रणा निर्माण झाली नाही

त्यानंतर प्रबोधनाचा मराठी प्रोजेक्टही सामाजिक पातळीवर बरा चालला पण विज्ञानाच्या पातळीवर आपण ढ निघाल्याने हा प्रोजेक्ट फाफललेला आहे इथेही लोकहितवादी , रानडे , ह्यांच्या मार्गी प्रबोधनाविरुद्ध फुले ह्यांचे देशी प्रबोधन उभे ठाकले व पुढे केशवसुत सावरकर गडकरी ह्यांच्या मार्गी रोमँटिसिझमविरुद्ध पुढे पु शी रेगे ,ना घ देशपांडे , बहिणाबाई चौधरी ह्यांचा अस्सल देशी मराठी रोमँटिसिझम येतोच म्हणजेच देशी मराठी मोक्षता देशी मराठी प्रबोधनता आपल्याला सापडते पण आपण त्याचे विश्लेषण करतो का उदाहरणार्थ निवृत्तीनाथ हे योगी होते तरीही योगोपायावर अस्सल मराठी म्हणावा असा ग्रंथ यायला विसावे शतक उजाडते आपले मराठी ब्राम्हण लोक इतके भंपक आहेत कि त्यांना आजही राजयोग म्हंटले विवेकानंद आठवतात वास्तविक कृष्णाजी केशव कोल्हटकर ह्यांचे भारतीय मानसशास्त्र हे  पुस्तक अधिक सटीक आहे

मोक्षयुगातील भक्तोपाय प्रबोधनयुगात ज्ञानकेंद्री झाला ते उत्तमच झाले पण तो पुरेसा ज्ञानकेंद्री झाला नाही मोक्षतेत ह्या काळात कर्मयोगी गाडगे महाराजांच्याबरोबर ज्ञानयोगी राजयोगी निसर्गदत्त महाराजांचे केंद्रस्थानी येणे व्हायला हवे होते पण तसे झाले नाही केंद्रस्थानी कोण आलं तर साईबाबा ! वास्तविक दोघेही मोक्ष मिळालेले पण एक ज्ञानयोगी होता तर दुसरा राजयोगी तरीही सईबाबान्च्याबरोबर राजयोग वाढला नाही तर भक्तियोग वाढला ही मानसिकता काय आहे ? कि निसर्गदत्त महाराज ब्राम्हण असल्याने साईडलाईन केले गेले ? कि त्यांनी तथाकथित चमत्कार केले नाही म्हणून ते लायकीचे वाटले नाहीत ? मोक्षयुगात महाराष्ट्रात अनेक ज्ञानोपायी झाले पण त्यांचे ज्ञान संकलित केलेच गेले नाही फक्त वैष्णव भक्त असलेले संत अभंगगाथेतून सतत उपलब्ध होतील ह्याची काळजी घेतली गेली असे का ? वारकरी संप्रदायाची ही दादागिरी आहे कि त्यांनी आपले काम चोख बजावले आणि बाकीच्यांनी आपल्या संप्रदायाचे काम चोख बजावले नाही म्हणून हे घडले ? मराठी संस्कृती वारकऱ्यांच्यामुळे अचानक वैष्णवकेंद्री व भक्तिकेंद्री बनल्याने आज मराठी संस्कृतीची वाट लागली आहे पण लक्ष्यात कोण घेतो आपली चॅनेल्स व मीडियाही वैष्णव आहे ह्याला शह देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्ञानकेंद्री बौद्ध परंपरा महाराष्ट्रात पुन्हा आणली पण तिचा म्हणावा तसा परिणाम झालेला दिसत नाही बाबासाहेबांनी प्रबोधनाचे पोटी अंग  विस्तारले आणि व्यापक करण्याचा प्रयत्नही केला पण आज आंबेडकरही फ्लॉप होतात कि काय अशी शंका येते आहे

ह्यानंतरचा प्रोजेक्ट आधुनिकतेचा आहे आणि त्याचा पहिला टप्पा मार्गी आहे जो मर्ढेकरांनी सुरु केला तर दुसरा देशी नवतेचा आहे जो नेमाडे चित्रे कोलटकरांनी सुरु केला ह्यातील मार्गीचा म्हणजे आंतर्राष्ट्रीय आधुनिकतेचा नीट मागोवा आपण घेतला का ? आधुनिकतेचे मुख्य आरंभिक  तत्वज्ञान अस्तित्ववाद ! आधुनिकतावादी अस्तित्ववाद तत्वज्ञान  किर्केगार्दपासून सुरु होतो  तर उत्तरवादी  उत्तर-अस्तित्ववादी तत्वज्ञान फ्रेडरिक  नित्शेपासून सुरु होते मराठीत ह्यांचे साधे अनुवाद तरी झाले का ? राजवाड्यांनी नित्शेचा एक अनुवाद केला तेवढाच पण पुढे काय ? मराठीत अस्तित्ववादी म्हणावे असे लेखन फक्त सदानंद रेगे , किरण नगरकर , विश्वास पाटील (नवे क्षितिज वाले )विलास सारंगांनी केलेले दिसते चित्रे कोलटकर नेमाडे (कोसला )सुरवातीला अस्तित्ववादी होते पण नंतर देशीवादी झाले आता ही जी स्थलांतरता आहे ती आंतरराष्ट्रीय आधुनिकतेकडून मराठी आधुनिकतेकडे आहे असे जर आपण मानले तर ही देशी आधुनिकता मराठी आधुनिकता किस चिडियाका नाम है भाई ?  दुसरे आरंभिक तत्वज्ञान रचनावाद ज्याची सुरवात संरचनावादाने होते आणि मध्य उत्तरसंरचनावादाने तर शेवट उत्तरवादी तत्त्वज्ञानाने ज्यात  उत्तरआधुनिकवाद , उत्तरवसाहतवाद , देशीवाद  वैग्रे सर्व तत्वज्ञाने येतात

फेसबुकवरची आत्ताची जी पिढी आहे त्यातील  ५० टक्के लेखक रोमँटिक ४० टक्के प्रबोधनवादी आहेत  ५ टक्के आधुनिक आणि ४ टक्के देशीवादी व १ टक्का चौथ्या नवतेचे आहेत प्रश्न असा आहे कि जे रोमँटिक आहेत त्यांना तरी रोमँटिसिझम कळलाय का ? किशोर कदम चंद्रशेखर सानेकरपासून प्रिया जामकरपर्यंत अनेकांचा पिंड रोमँटिक आहे त्यामुळे त्यांच्या कवितेत रोमँटिसिझम ताकद बनून येतो पण अनेकांचा तसा तो पिंडच  नाही हे लोक फिल्मी आणि कमअस्सल  लिहितात बहुतेकांचा रोमँटिसिझम हा ना धो महानोर पु शी रेगे ग्रेस ह्यांच्याप्रमाणे देशी आहे हे त्यातल्या त्यात चांगले आहे हीच अवस्था प्रबोधनवादाची आहे फार कमी कविंना प्रबोधनाची व परिवर्तनाची आंतरिक तळमळ आहे अनेकजण आंबेडकरांच्या पोटी परंपरेत लिहितात पण तळमळ वर्तमानपत्री सपाट आहे अनेक मार्क्सवादी कवीही पोरकट लिहितायत हे लोक पाश , ढसाळ वा मायकोव्हस्कीचे नाव का घेतात असाच प्रश्न पडतो पाश तुमच्या वॉलवरून दिसून काय फायदा ? तो तुमच्या कवितेतून दिसला पाहिजे आणि तुम्ही ग्रेट कार्यकर्ते असाल तर ते ग्रेट कार्यकर्तेपण तुमच्या कवितेत दिसलं पाहिजे नाहीतर "पाश नही लाश" म्हणायची पाळी येते

आधुनिक व देशी कवितेत सर्वात उत्तम लेखन चालू आहे उदा चं प्र देशपांडें ते ठामपणे देशीवाद नाकारतायत आणि अस्तिववादी ऍब्सर्डिस्ट लिहीतायत खरेतर ही शैली जगत्मान्य आहे तरीही फार कमी  मराठी लोक त्यात आहेत नामदेव कोळींच्यापासून अनेकजण देशीवादी आहेत आणि त्याचे कारण त्यांच्या अस्तित्वाची मुळे आजही गावात टिकून आहेत म्हणजे औदुंबर मुंबईत आहेत आणि ते  पाय मात्र नदीत टाकून बसले  आहेत
ह्यां सर्वांच्यात वाद आहेत का तर मला माहीत नाही पण एक गोष्ट नक्की वाद व्हायला पाठीचे कणे ताठ असावे लागतात सरसकट सगळ्याला चांगलं म्हणणारे लोक फालतू असतात असं माझं मत आहे  ज्याला नेमाडे लेखकाची नैतिकता आणि जिला मी लेखकाची अध्यात्मिकता म्हणतो ती ह्या दोन्हीपैकी एकही गोष्ट अशा लोकांच्याकडे नसते

आणि ह्यापुढचा जो चिन्हसृष्टीयतेचा प्रोजेक्ट आहे जो सौष्ठवमधून चालू झाला अभिधा अभिधानानंतर शब्दवेध  मधून विस्तारित झाला त्याविषयी ! तो समजा आंतरराष्ट्रीय मार्गी  जालीय नवतेचा आहे असे आपण गृहीत धरले तर त्याचे तरी विश्लेषण आपण नीट करणार आहोत का ? गोष्टी मोडीत काढल्याचं पाहिजेत पण त्यासाठी त्या आधी समजून तर घेतल्याचं पाहिजेत आणि समजा तुम्हाला मार्गी विरुद्ध देशी विरुद्ध पोटी असा संघर्ष पुढे चालवायचा असेल तर देशी/ मराठी जालीयता म्हणजे काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि मराठी जालीयता सांगायची असेल तर मराठी आधुनिकतेचा प्रश्न उभा ठाकतोच आणि अधिक खोलात गेलात तर मराठी मोक्षतेचा मराठी प्रबोधनतेचाही ! मी चौथी नवता मांडतांना सांगोपांग विचार करूनच मांडली होती अभ्यास न करता नवता सांगोपांग मांडता येणे शक्य नसते पाचवी नवता यावी असं मलाही वाटतं पण केशवसुतांच्या रोमँटिक नवतेप्रमाणे उथळ आणि उठवळ होऊन तिने येऊ नये थोडे खोलात जावे

श्रीधर तिळवे नाईक

आशुतोष दिवाण ह्यांनी माझ्या छोट्या लेखावर पुढील कॉमेंट दिलीये


सर,
आपल्याइतका अभ्यास व टेक्निकल जार्गन कळत नाही,पण लिखाणाचा जीस्ट समजून घ्यावा.
आपण अस्तीत्ववादी/ॲबसर्ड अस्तीत्ववादी या कॅटॅगिरीत जी नावे घालता त्यातील
सारंग,रेगे वगैरे ठीक आहे पण नगरकर यांच्याबद्दल काही समजत नाही.रेगे सारंगांचे साहित्य आपल्या जीवनाला सूक्ष्मपणे लागू आहे असे ॲार्गॅनिकली वाटत राहते,तसे नगरकरांचे,विशेषत: इंग्रजी लेखन वाटत नाही.इंटेलेक्च्यूअली ते तंत्र त्यांनी वापरले आहे व आपल्या कसल्याच स्पष्ट अस्पष्ट जिवनानुभवाला किंवा जीवनआकलनाला ते जुळत नाही असे वाटते.
तसाच अनुभव मराठीत या दिशेचे कवि,”अरुण कोलटकरची कविता”नंतरचे कोलटकर आणि चंप्र आणि लाखे यांच्याबद्दल जास्त येतो.बळवंतबुवाच्या कविता काय,द्रोण काय हे तत्कालीन वाटत राहते.चंप्रंचे एकवेळ ठीक आहे पण आजचे मान्यताप्राप्त महत्वाचे कवी लाखे यांची ॲबसर्डीटी इतकी इनकोहेरंट असते की ती परपझलेस वाटते.अगदी वेटींग फाॅर गोदो सुद्धा माझ्या आयुष्याला लागू आहे हे मला कळते तसे या कविंचे होत नाही.वाचकाला कसलेच भान न देणारी चमत्क”कृती”चांगली महत्वाची कशी म्हणायची?मी नगरकरांच्या कादंबय्रा वाचण्यात वेळ वाया का घालवायचा हे मला कळत नाही.मार्गदर्शन व्हावे.
(श्रीधर तीळवे यांना विचारलेला एक प्रश्नवजा कमेंट)

उत्तर
आशुतोषजी धन्यवाद ! अस्तित्ववाद ही आशयकेंद्री चळवळ होती आणि तिने अनेक संरचना धारण केल्या त्यातील जवळ जवळ शेवटची संरचना अब्सर्ड चळवळ जी सात्रच्या ! किरण नगरकर आणि भाऊ पाध्ये ह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यांनी अस्तित्ववादी आणि वास्तववादी असे दोन्ही पद्धतीचे लेखन केले हे काम्यू बाबतही घडलेले आहे त्याची आउटसायडर अस्तित्ववादी तर प्लेग वास्तववादी आहे भाऊ पाध्येंची बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर  व नगरकरांची सात सक्क त्रेचाळीस हे अस्तित्ववादी लेखन आहे शक्यता अशी आहे कि सात सक्क आणि बेडरूम स्टोरी अस्तित्ववादी असल्याने तुम्हाला आवडली असेल आणि वास्तववादी लेखन असलेल्या इतर कलाकृती तुम्हाला आवडल्या नसतील तर मी समजू शकतो

माझा पहिला प्रश्न हा आशय लेखकाने का निवडला असेल असा असतो ककल्ड नगरकरांनी का लिहिली असेल अस्तित्ववाद म्हणेल कि हा अदर चा प्रश्न आहे म्हणजे श्रीकृष्ण गिरीधर गोपाळ हा अदर आहे आणि हा अदर काल्पनिक किंवा फिक्शनल किंवा सररिअल  आहे मात्र मीरेसाठी तो वास्तव आहे आता जी गोष्ट आपल्यासाठी काल्पनिक आहे ती दुसऱ्यासाठी वास्तव असेल तर ! सार्त्र असता तर श्रीकृष्ण ही  बॅड फेथ आहे म्हणून पाठ करून निघून गेला असता तर किर्केगार्द हा ईश्वर म्हणून थांबला असता नगरकर किर्केगार्दच्या मार्गाने जातात ईश्वर इललॉजिकल आहे म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणणारा किर्केगार्द हा मीरेच्या जवळ आहे  मीरेच्या श्रीकृष्णात आपल्या वारकरी संतांच्या विठ्ठलात आणि किर्केगार्दच्या गॉडमध्ये फरक नाही प्रश्न असा आहे कि राणाने काय करायचे ककल्ड ही राणाची शोकांतिका आहे नगरकरांना ह्या विषयावर ग्रेट कादंबरी निर्माण करता आली असती पण ते झाले नाही एका अप टू द मार्कपाशी ते थांबले रावण अँड एडीही अशीच जी  झळाळी सात सक्क मध्ये आहे ती इंग्लिश लिखाणात नाही

आपल्या आयुष्याशी जीवनानुभवनाशी जीवनाकलनाशी जुळणारे लेखन अनेक वाचक शोधत असतात तुम्ही जर तसे वाचन करत असाल तर तुमच्यासाठी ती योग्य पद्धत आहे ह्याला मी डिस्कव्हरर वाचक म्हणतो हे लोक आपल्या आयुष्याचा शोध इतरांच्या लिखाणात घेतात तुम्हाला काय आवडलं नाही हे सांगण्यापेक्षा काय आवडलं हे सांगितलंत तर ह्यावर संवाद होऊ शकतो म्हणजे मला फक्त मोक्षावरचं लिखाण भावायचं त्यामुळं विसाव्या शतकातील सगळं लेखन माझ्यासाठी रद्दी होतं ही झाली वैयक्तिक आवड ती ऑब्जेक्टिव्ह आवड म्हणून घेऊन मी समीक्षेत यावे का ? तर नाही आपल्याशिवायही जग असतं आणि त्या जगाच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात माझी दुसरी कसोटी ही चौथी नवता असते पण असे साहित्य जगभर कमी लिहिले जात आहे तर मग काय करावे तर तिसरी कसोटी लावावी म्हणजे किमान कलेने दुसऱ्या आणि तिसऱ्या आधुनिक व उत्तराधुनिक नवतेत असावं आता हे कलाकृतीत नसेल तर काय तर चौथी कसोटी प्रबोधनात्मक कला असते ज्यात त्या कलाकाराचा पिंड आहे का आणि लिहितांना ती व्यक्ती जेन्युईन आहे का हे मी बघतो पाचवी अर्थात प्रतिभेची व कौशल्याची आहे तुमच्या कसोट्या काय आहेत ?

नुसती भावणे हीच एकमेव कसोटी असेल तर आपले फारसे जमणे शक्य नाही कारण भावणे ही आद्य अट आहे पण दुर्देवाने ती सापेक्ष आहे म्हणजे वाचणाऱ्याच्या कुवतीवरही भावणे अवलंबून आहे नवतावादी साहित्य प्रथम भावत नाही कारण वाचकाचा त्या अनुभवविश्वाशी रिलेव्हन्स तयारच नसतो तो हळूहळू तयार होत जातो रणांगण ह्या कादंबरीबाबत हे घडलेले आहे तर वाचक म्हणून आपण अद्ययावत कलेसाठी स्वतःला पुरेसं खुले केले आहे का तेही स्वतःलाच विचारावं लागतं निदान माझा स्वतःचा तसा प्रयत्न असतो

वाचक म्हणून काहीच तयारी करावी लागत नाही असा एक फार मोठा गैरसमज मराठी लोकांच्यात आहे म्हणून हे तपशीलवार चिंतन !

कोलटकरांच्या चिरीमिरीवर मी शब्दवेध मध्ये लेख लिहिला  आहे मला हा संग्रह आवडला होता द्रोणनं मात्र दारुण अपेक्षाभंग केला कारण कोलटकर जे साधायला चालले होते त्याच्याशी विसंगत असे त्यात काहीतरी आहे लाखे हे आरंभापासूनच अस्तित्ववादी लेखक आहेत तुम्ही जर का युरोअमेरिकन साहित्य वाचले असेल तर त्यांच्यात नवीन काहीच सापडत नाही पण ते वगळले तर काही सापडू शकते ऍब्सर्डिटी पर्पझलेसच असते म्हणून तर ती अब्सर्ड असते त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही  मराठी आधुनिकतेचा प्रश्न लाखे आणि चं प्र देशपांडे ह्यांच्या संदर्भात मराठी अस्तित्ववादाचा प्रश्न बनून येतो ह्या दोघांनाही मराठी अस्तित्ववाद सापडला आहे का ?

चं प्र देशपांडेची कवितालेखन पद्धत हीच मुळात वेगळी आहे  भावनाशीलतेपेक्षा त्यांचा भर बुद्धीशीलतेवर आहे आणि त्यामुळेच भावनाशीलतेला महत्व देणाऱ्या वाचकांना ती अपील होणे शक्य नाही बुद्धीशीलतेवर भर देणाऱ्या काही कविता मीही  लिहिलेत त्यामुळं चं प्र नां मी समजू शकतो त्यांच्या कवितेत जेव्हा क्राफ्टिंग अवाजवी महत्वाचे होते तेव्हा त्यांच्या कविता कोसळतात जेव्हा बुद्धीशीलता आणि प्रगल्भता ह्यांचा समतोल निर्माण होतो तेव्हा त्या जमून जातात

वेटिंग फॉर गोदो ही अद्वितीय कलाकृती आहे तिनं तुम्हाला भान दिलं म्हणजे नेमकं काय केलं ? आणि समजा भान ही तुमची कसोटी असेल तर ती निरपेक्ष आहे का ? तर नाही भान हीही सापेक्ष कसोटी आहे आणि जर ह्या कसोटीनुसार एखादी कलाकृती तुम्हाला भान देत नसेल तर तुम्ही ती वाचूच नये राम गणेश गडकऱ्यांच्या नाटकावर पिंड पोसला गेलेल्या पिढीला वेटिंग फॉर गोदो कसलं भान देणार ? शेवटी लेखक व वाचक ह्या दोन स्वतंत्र व्यक्ती असतात कधी लेखक पुढे असतो तर कधी वाचक आता जो मागे असतो त्याला अंतर भरून काढणे भाग आहे सर्वात उत्तम वाचन तेव्हा होते जेव्हा दोघे हातात हात घालून एकमेकांच्या संहिता एकमेकात घालत चालतात हे सोबत चालणे घडले तर उत्तम नाही घडले तर चालणे सोडून द्यावे हे उत्तम !

श्रीधर तिळवे नाईक





आशुतोष दिवाण ह्यांनी विचारलेले प्रश्न आणि मी त्यांना दिलेली उत्तरे श्रीधर तिळवे नाईक

सर,
सगळेच काही कळले असेल असे नाही पण बरेचसे लक्षात आले असावे.दोन गोष्टी लिहाव्यात असे वाटते.
१)आपण साधारणपणे,हे जे सगळे प्रकार सांगितले आहेत,वास्तववादी,अस्तीत्ववादी,चौथी नवता,माॅडर्न वगैरे आपल्याला जे महत्वाचे व निश्चीत वेगळी आयडेंटीटी वाले आहेत असे वाटते,त्या प्रत्येकाची आपल्याला महत्वाची वाटणारी,प्रोटोटाईप,उपलब्ध असणारी,इंग्रजीतली दोन व मराठीतली दोन अशी पुस्तके सांगितली तर ती वाचून पाहून आपल्याला ती भावतात,आवडतात,समजतात वगैरे करुन आपण कोठे आहोत हे मला ठरवता येईल.
२)ॲब्सर्डीटी पर्पझलेस असते म्हणून ती ॲब्सर्डीटी असते ह्या विधानाची मला काळजी वाटते.आता समजा राजा रविवर्मा ते समजा हुसेन ते समजा बरवे ते समजा पाॅल क्ली ते समजा गायतोंडे असा स्पेक्ट्रम घेतला (ॲबस्ट्रॅक्ट ॲबसर्ड समजा थोडे विसरु) तर क्षमतेनुसार कोणी बरवें पाशी थांबेल,कोणी गायतोंडेंपाशी.पण गायतोंडेंपर्यंत जाणारा माणूसही समजा एखाद्या मुलाने किंवा एखाद्या वेड्याने काहीही रंगवले तर त्याला महत्व देणार नाही.मला नीट सांगता येणार नाही पण काहीतरी कोहेरन्स,संगती,डिराइव्ह्ड मीनींग,काहीतरी पुसटशी का होईना इंटेलीजंटली ॲट्रीब्यूटेबल डाफायनेबल थोरवीची खूण आपण ठरवायला हवी.ही लाखेंची कविता थोर आहे कारण तिची थोरवी फक्त चंप्रंनाच कळते व चंप्रहे निर्विवादपणे श्रेष्ठ कवितेचे कनोसीयर आहेत असे तर काही असणार नाही.(लाखेंचे अनेकोअनेक महत्वाचे चाहते आहेतच.पण वादाकरता)(चंप्र आणि लाखे, आय होप यू अंडरस्टॅंड दॅट आय ॲम नाॅट बिईंग पर्सनल.समजून घेण्याचा प्रयत्न चालला आहे).गोदो शंभरांनी वाचली तर चाळीसांना अपील होईल,तसेच बरेच नीट साहित्य कळणाय्राला,वाचणाय्राला,तीचा ग्रेटनेस कळलाच नाही असेही होणार नाही.म्हणजे तो झॅप होणार नाही कदाचीत पण त्याची महत्ता त्याला जाणवेलच.थोडक्यात या गोष्टींचे लसावी मसावी ठरवावे लागतील असे वाटते.
लहान मुलासारखे प्रश्न विचारत आहे पण त्यामुळे माझे शिक्षण नक्की होत आहे.इतरांना फायदा होतोय का नाही माहीत नाही.त्रास वाटत असल्यास क्षमस्व.या मॅटर पुरता थांबतो.

आशुतोषजी धन्यवाद! 

प्रथम दुसरा मुद्दा घेतो मग पहिला तुम्हाला जो कोहेरेन्स किंवा डीराएव्हडं मिनिंग हवं आहे तोच चौथ्या नवतेचा एक महत्वाचा आग्रह आहे उत्तराधुनिकता ही आईन्स्टाईनच्या सापेक्षतेनं आणि क्वांटम अनिश्चिततेनं भारावलेली आहे त्यातुन न्याय कसा द्यायचा कारण न्याय द्यायला काही विशिष्ट मूल्ये स्थिर असावी लागतात म्हणूनच मी उत्तराधुनिकता नाकारतो आणि चौथ्या नवतेचा आग्रह धरतो जी कोहरन्स शोधते ह्यातून सम्यक समग्रवाद जन्मतो सम्यक समग्रवाद मार्गी देशी पोटी आणि जमाती ह्या सर्वांना एका ब्रह्मांडीक समग्रत्तेत पाहतो त्यांच्यातला केऑस आणि नेटवर्क ह्या दोघांनाही पेलतो माझी अडा हॉ का बा ना सु ना ही कादंबरी त्यातून जन्मलेली आहे मराठीत ह्या मार्गाने अजूनही काही लिहिलं गेलेलं माझ्या वाचनात नाही आता सर्वांनी चौथी नवता सम्यक समग्रवादी पद्धतीने पेलावी का ? तर नाही ज्यांना सम्यक समग्रवाद मान्य नाही त्यांना दुसरा मार्ग आहे आणि तो नितीन वाघ ह्यांनी शोधला आहे त्याला  आंबेडकरी  देशीवाद म्हणता येईल आणि त्यांच्या व्हर्जिन ह्या कादंबरीचा ह्या संदर्भात उल्लेख करता येईल ती ह्या समकालीन डिजिटल जगातील शोषणाच्या सूक्ष्म तऱ्हा मांडते ज्यांना हे दोन पर्याय मान्य नाहीत त्यांच्यासाठी तिसरा पर्याय हा कवितेत मन्या जोशी आणि सलील वाघ ह्यांनी आणला आहे सलील वाघ ह्यांची ट्राफिक ही कविता महत्वाची ! ह्याशिवाय मी हेमंत दिवटे आम्ही दोघांनीही मॉल वर लिहिलेल्या कविता ह्याशिवाय मॉल वर लिहिलेल्या कथा माझी स्मरणशक्ती धोखा देत नसेल तर जयंत पवार ह्यांनी अशी कथा लिहिली आहे  ! उत्तराधुनिकतेचा चौथ्या नवतेतील चिन्हसृष्टीकरणाचा बाज कायम ठेवायचा पण दृष्टी उत्तराधुनिक ठेवायची ह्या अंगाने आलेली महत्वाची कादंबरी म्हणजे प्रणव सखदेवची मेट्रोमॉल महानगरातील लेखकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे तिचा कोहरन्स आहे चंगळवाद जो एका ड्रीमी सिक्वेन्समधून जातो

चौथ्या नवतेचे जागतिक साहित्य मी सांगू शकणार नाही कारण  ह्या संदर्भात मी अधिकारी पुरुष नाही आणि त्याचे कारण पर्सनल आहे आजारांमुळे वाचन करण्याच्या घटलेल्या क्षमता !

तुम्ही उल्लेख केलेले सर्व चित्रकार आधुनिक आहेत आणि आधुनिकतेने अनेक इजम दिलेत

१ अस्तित्ववाद
२ इम्प्रेशनिज्म
३ सिम्बॉलिज्म
४ एक्सप्रेशनिझम
५ सररियॅलिज्म
६ अमूर्तवाद

गायतोंडे आधुनिक अध्यात्मिक अमूर्तवादाचे उत्तम भारतीय उदाहरण आहेत ते ह्या वादातले सर्वश्रेष्ठ आहेत कारण त्यांच्या चित्रात मेडिटेशन साक्षात उतरलेले आहे दुसरे प्रभाकर बर्वे तिसरे प्रभाकर कोलते वेटिंग फॉर गोदोतले वेटिंग अमूर्त आहे त्याला आकार नाही मात्र आशय अस्तित्ववादी आहे चं प्र व लाखे अस्तित्ववादी आहेत हे आपण पाहिले आहेच

श्रेष्ठत्वाची पहिली कसोटी नवता आहे ती भारतीयांच्यात मिसिंग आहे चौथी नवता ही एकमेव नवता अशी आहे जी अमेरिका युरोपच्या पॅरलल आली बाकी नवता तिकडच्या कॉपीकॅट आणि साधारण ३०० ते तीस वर्षे उशिरा आलेल्या  आहेत वेटिंग फॉर गोदो हे पूर्ण नवतावादी होते म्हणूनच ते अनेकांना अपील होते

दुसरी कसोटी नवीनता असणे नवतावादी  नसेल तर किमान कलाकृती नवीन  असावी अमेरिका युरोपची नक्कल नको आणि नवीनता फक्त भारतीय मार्गी किंवा भारतीय देशी किंवा भारतीय पोटी किंवा भारतीय जमातीतच सापडू शकते उदा कॅचर इन द राय ही नवतावादी तर कोसला नवीनतावादीआहे कारण मराठी अवकाशातील विध्यार्थी जग आहे 

तिसरी कसोटी नाविन्यता आहे नवीनता नसेल तर किमान नाविन्यता असावी म्हणजे थीम आधीच कुणीतरी वापरलेली असेल तर निदान त्यात नाविन्यता असावी उदा उपनिषदातले दोन पक्षी पण त्यांना वापरून जेव्हा पु शि रेगे जी कविता लिहितात ती नावीन्याने पूर्ण भरलेली असते किंवा लैला मजनू ह्या पारंपरिक कथेत शेक्सपियर रोमिओ अँड ज्युलिएट लिहून जे नावीन्य भरतो ते अभूतपूर्व असते

चौथी कसोटी ताजगी आहे नाविन्यताही नसेल तर किमान ताजगी असावी कलाकृतीत किमान फ्रेशनेस असावा आणि ताजगीही नसेल तर कलाकृती कचऱ्यात टाकावी

ह्या चार कसोट्या माझा म सा वि आहे त्यात ज्या कलाकृती बसत नाहीत त्यांच्यावर मी माझा वेळ वाया घालवत नाही

आता तुमच्या पहिल्या मुद्द्याकडे येतो

प्रबोधन वा विज्ञान युगाने अनेक ईजम जन्माला घातले त्याचा आरंभ निसर्गवादापासून होतो हे इजम पुढीलप्रमाणे


१ निसर्गप्रामाण्यवाद वा निसर्गवाद आबालाल रहमान ह्यांची रंकाळा व कोटितीर्थावरची चित्रे सर्वात गाजलेले मोनालिसा औदुंबर ही बालकवींची कविता इथे मानवी  इंद्रियविरहित निसर्ग जसा आहे तसा पेलण्याचा प्रयत्न असतो
२ इंद्रियप्रामाण्यवाद कान डोळा आदी इंद्रियांना प्रमाण मानून जग त्यांना इंद्रियांना जसे दिसते तसे रंगवणे आपल्याकडे अनेकदा ह्याची गल्लत वास्तववादाशी केली जाते उदा बनगरवाडी
३ बुद्धिप्रामाण्यवाद महात्मा फुले ह्यांचे अभंग व त्यांचे तृतीय रत्न हे नाटक
४ भावप्रामाण्यवाद  वा स्वच्छंदवाद गालिबचा दिवान  रवींद्रनाथ टागोर महादेवी वर्मा शेली वडस्वर्थ बुद्धीपेक्षा भावना महत्वाची कानेटकरांचे रायगडाला जेव्हा जाग येते इथे  ओशाळला मृत्यू
५ वास्तववाद बिढार जरीला झूल वास्तववाद हा मानवी व्यवस्थांशीही निगडीत असतो निसर्गवाद व इंद्रियप्रामाण्यवादाला मानवी व्यवस्थांशी काहीही देणंघेणं नसते त्या निसर्गाच्या भाग बनून येतात वास्तववादात  समाजव्यवस्था राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था फार महत्वाच्या असतात बिढार जरीला झुलमध्ये शिक्षणव्यवस्था महत्वाची आहे इब्सेनचे डॉल्स हाऊस व पिलर ऑफ द सोसायटी तेंडुलकरांचे कन्यादान व कमला प्रेमानंद गजवीचें किरवंत


आधुनिक युगात १ अस्तित्ववाद २ इम्प्रेशनिज्म ३ सिम्बॉलिज्म ४ एक्सप्रेशनिझम ५ सररियॅलिज्म ६ अमूर्तवाद हे फार महत्वाचे

१ अस्तित्ववाद खानोलकरांचे एक शून्य बाजीराव तेंडुलकरांचे सखाराम बाईंडर सार्त्रचे  फ्लाईज व नो एग्झिट
२ इम्प्रेशनिज्म  जेम्स जॉईसची युलिसिस मर्ढेकरांची पिपात मेले ओल्या उंदीर दिलीप चित्रेंची ऑर्फियस जी ए ची कैरी मॉनेचे इम्प्रेशन सिरीज एम एफ हुसेनचे सरस्वती
३ सिम्बॉलिज्म जी ए ची विदूषक महेश एलकुंचवारांचे वाडा चिरेबंदी गिरीश कर्नाड ह्यांचे हयवदन नागमंडल
४ एक्सप्रेशनिझम इलियटची वेस्ट लँड ही कविता आयनेस्कोचे चेअर्स दिलीप चित्रेंचा पहिला कवितासंग्रह विशेषतः जुलाय ही कविता प्रभाकर बर्वे ह्यांचे एक चित्र आहे त्यात त्यांनी खुर्ची सत्ताधारी माणसासारखी काढलीये
५ सररियॅलिज्म काफ्काची मेटामॉर्फोसिस ही कथा आयनेस्कोचे ऱ्हेनॉसिरॉस हे नाटक माझा डेकॅथलॉन सररियल हा अख्खा काव्यसंग्रह सररियल आहे सालवोद्गार दालीची घड्याळे प्रसिद्ध आहेत 
६ अमूर्तवाद गायतोंडे पॉल क्ली गायतोंडे मेडिटेटिव्ह आहेत तर पॉल क्ली ऍक्शनल आहे

उत्तराधुनिकमध्ये सिलिंजरची कॅचर इन द राय  शंभर मी ही श्याम मनोहरांची कादंबरी लक्ष्यवेधी आहे

मला वाटतं इतकी नावे पुरेशी आहेत तपशिलात चुका असतील तर क्षमाप्रार्थी आहे काहींच्यावर मला सविस्तर बोलायचे किंवा लिहायचे आहे उदा सतीश तांबे ह्यांच्या कथा त्यामुळे त्यांचा उल्लेख टाळला आहे काहींच्यावर आधीच लिहिले आहे त्यामुळे त्यांचाही उल्लेख टाळला आहे उदा नामदेव ढसाळ अपवाद मनोज जोशी व सलील वाघ मेट्रोमॉलवर सविस्तर बोलायचे आहे पण तरीही उल्लेख केला ह्याचे कारण चौथ्या नवतेचे साहित्य इतके कमी आहे कि दुसरे उदाहरण सापडेना नुसतं फेसबुकवर आलो कि आपण पोस्टमॉडर्न होतो असा अनेकांचा गैरसमज आहे माझ्या पिढीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आम्ही कादंबऱ्या लिहिल्या नाहीत ज्या लिहिल्या त्या देशीवादी होत्या किंवा आधुनिक होत्या सगळ्यांना इन्स्टंट प्रसिद्धी हवी समीक्षा तर सिरियसली कुणाला करायची नाही मात्र समीक्षक म्हणून इतरांना कसं वापरता येईल असा विचार ! अशा करंट्या संस्कृतीत नवता वाढत नसते फक्त नवतेचें मार्केटिंग वाढत असते लिखाणापेक्षा प्रमोशनवर भर देणारी ही पिढी आहे त्त्यामुळं नवता समृद्ध होत नाहीये प्रमोशन समृद्ध होते आहे तरीही बेस्ट ऑफ लक माझी अशावेळी एकच प्रतिक्रिया असते "मरा लेको मी जगतो"
धन्यवाद

श्रीधर तिळवे नाईक









नेहमीच मी काय केले असते असा असतो म्हणजे मी मीरेवर लिहिले असते तर काय केले असते





. > चं प्र देशपांडेची कवितालेखन पद्धत हीच मुळात वेगळी आहे मी चुकत नसेन तर ते कविता लेखन करायला बसतात असं त्यांनी म्हंटलं आहे < -- एवढ्यापुरतेच बोलतो. मी कविता करायला वा रचायला बसत नाही. कवितेला काही निमित्त दिसते आणि मी लिहू लागतो -- प्रत्येक ओळ मला नवीच असते. सामान्यतः कविता एका वेळी लिहून पूर्ण होते. पुन्हा वाचताना एखादा शब्द कमीजास्त केला जाऊ शकतो. पण, लिहून झालेले जवळजवळ अंतिमच असते. मी मुद्दाम भावनाशीलता टाळायचा प्रयत्न करत नाही. व्यक्तिगत भावभावना व्यक्त करण्यात मला फारसे स्वारस्यच नाहीय. कवितांची निमित्ते वेगवेगळी असतात -- जगण्यातले ( जे असेल ते ) आकलन हा आशय एकच असतो.








Comments

Popular posts from this blog